🚨💧 सिना–माढा योजनेच्या पाण्यासाठी पुन्हा आमरण उपोषण!
⚠️ ‘टेल टू हेड’ पद्धतीने पाणी सोडण्याची मागणी; ४०० ते ५०० शेतकऱ्यांचा उपोषणाला पाठिंबा
सिना–माढा पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून माढा तालुक्यातील विविध गावांना ‘टेल टू हेड’ पद्धतीने समान व नियोजनबद्ध पाणीपुरवठा करणे आवश्यक असताना, योग्य पद्धतीने पाणी सोडले जात नसल्याने अनेक गावांमध्ये पाणीटंचाईची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
सध्या माढा व माढा परिसरातील चिंचोली, वेताळवाडी, रणदिवेवाडी, जाधववाडी, शिंदेवाडी, उपळाई, खैरवाडी, अंजनगाव (खे) यांसह अनेक गावांतील विहिरी व विंधन विहिरींची पाणीपातळी मोठ्या प्रमाणात खोलवर गेली आहे. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
🌾 पावसाचे प्रमाण कमी असल्याने जनावरांच्या वैरणीचा प्रश्नही शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. अशा परिस्थितीत सिना–माढा योजनेचे पाणी संबंधित सर्व गावांना समान पद्धतीने मिळणे अत्यंत आवश्यक असल्याची मागणी नागरिक व शेतकऱ्यांकडून होत आहे.
🔴 लेखी आश्वासनानंतरही पाणीपुरवठा न झाल्याचा आरोप
सिना–माढा योजनेचे पाणी ‘टेल टू हेड’ पद्धतीने सोडण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी आनंद बाबूराव कानडे यांनी दिनांक १० ऑगस्ट २०२६ रोजी अन्नत्याग आमरण उपोषण सुरू केले होते.
त्यावेळी मा. तहसीलदार तसेच संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पाणीपुरवठा करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले होते.
मात्र, लेखी आश्वासनाप्रमाणे अद्याप योग्य पद्धतीने पाणी सोडले जात नसल्याचा आरोप करत आनंद बाबूराव कानडे यांनी दिनांक २५ ऑगस्ट २०२६ पासून माढा तहसील कार्यालयासमोर पुन्हा अन्नत्याग आमरण उपोषण सुरू केले आहे.
👥 उपोषणाला ४०० ते ५०० शेतकऱ्यांची उपस्थिती
या उपोषणाला परिसरातील सुमारे ४०० ते ५०० शेतकरी व नागरिकांनी उपोषणस्थळी उपस्थित राहून जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे प्रशासनाने या गंभीर पाणीप्रश्नाची तातडीने दखल घेऊन सिना–माढा योजनेचे पाणी ‘टेल टू हेड’ पद्धतीने शेवटच्या गावापर्यंत पोहोचवावे, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.
💧 “शेवटच्या गावालाही समान पाणी मिळाले पाहिजे!”
पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने केवळ आश्वासन न देता प्रत्यक्षात योग्य नियोजन करून सिना–माढा योजनेचे पाणी टेल टू हेड पद्धतीने सोडावे, तसेच पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून होत आहे.
मुख्य संपादक : दत्ता सुरवसे






