📍 मुंबई, 23 फेब्रुवारी 2026
मंत्रालय मुंबई येथे सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष श्री. दत्ताभाऊ काकडे यांनी महाराष्ट्रातील सरपंच परिषदेमधील पदाधिकाऱ्यांसोबत माझी सदिच्छा भेट घेत राज्यातील मुदत संपलेल्या हजारो ग्रामपंचायतींच्या सरपंचांना प्रशासक म्हणून नियुक्तीबाबत जाहीर केलेल्या निर्णयाबद्दल आभार व्यक्त केले.
राज्यातील हजारो ग्रामपंचायतींची मुदत फेब्रुवारी 2026 मध्ये संपत आहे, त्यामुळे ग्रामपंचायतींवर सरपंचांनाच प्रशासक नेमण्यात यावे याबाबत सरपंच परिषदेचे अध्यक्ष आणि सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी मला निवेदन दिले होते. तसेच त्याबाबत सतत पाठपुरावा केला होता. त्यांच्या या मागणीनुसार मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींबाबत महत्त्वाचा निर्णय घेत प्रशासक पदाचा गुंता सोडवला आहे. आता ज्या ग्रामपंचायतीची मुदत दिनांक 28 फेब्रुवारी पर्यंत संपत आहे त्या ठिकाणी विद्यमान सरपंचालाच प्रशासक म्हणून नेमले जाणार आहे. त्यामुळे ग्रामपातळीवरील प्रशासनात सातत्य राहणार आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात काढलेल्या परिपत्रकानुसार 2026 मध्ये संपणार्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. मात्र राज्यातील ग्रामपंचायतची मोठी संख्या आणि विस्तार अधिकाऱ्यांची मर्यादित उपलब्धता लक्षात घेता सुधारित निर्णय घेण्यात आला आहे. प्रशासक आणि प्रशासकीय समितीचा कालावधी त्यांच्या नेमणुकीपासून सहा महिने किंवा संबंधित ग्रामपंचायतची निवडणूक पूर्ण होईपर्यंत जे आधी होईल तेवढा राहणार आहे.
याप्रसंगी सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी विविध विकासकामे, गावांच्या समस्या तसेच आगामी योजनांबाबत सविस्तर चर्चा केली, त्यांच्या सूचना व अपेक्षांचा सकारात्मक विचार करून गावांच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस पावले उचलण्याचे आश्वासन दिले.
मुख्य संपादक : दत्ता सुरवसे






