स्मार्ट मीटरविरोधात संभाजी ब्रिगेड आक्रमक : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, अदानी कंपनीचा निषेध
सोलापूर – स्मार्ट मीटरच्या माध्यमातून आकारण्यात येणाऱ्या वाढीव वीजबिलांबद्दल संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली आहे. संभाजी ब्रिगेडतर्फे माननीय जिल्हाधिकारी तसेच विज विभागाच्या अभियंत्यांना निवेदन देऊन वाढीव बिलांचा निषेध नोंदवण्यात आला. यावेळी अदानी कंपनीविरोधात घोषणा देत निदर्शनही करण्यात आले.
अदानी समूहामार्फत राज्यभरात टीओडी म्हणजेच ‘स्मार्ट मीटर’ बसवण्याचे काम सुरू आहे. मात्र हे मीटर बसवताना कंपनीकडून जबरदस्ती केल्याच्या तक्रारी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात येत आहेत. ग्राहक घरी नसताना बाहेरील भिंतीवरील पारंपरिक मीटर विनापरवानगी बदलले जात असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला. काही ठिकाणी कंपनीचे कर्मचारी “आता घरगुती रीडिंगसाठी कोणी येणार नाही”, “स्मार्ट मीटर बसवणे बंधनकारक आहे” असे सांगून ग्राहकांची दिशाभूल करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.
स्मार्ट मीटर बसवल्यानंतर दुपटीने व तिपटीने वीजबिले वाढत असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला. वाढीव बिलांसाठी ग्राहक लाईट ऑफिसमध्ये गेले असता अधिकारी तक्रारींची दखल घेत नाहीत, उलट दमदाटी केली जाते, अशा तक्रारी मोठ्या प्रमाणावर असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.
सोलापूर हे यंत्रमाग कामगारांचे शहर असून येथे रोजगाराची मोठी टंचाई आहे. महिन्याला पाच ते दहा हजार रुपये मजुरी मिळवणाऱ्या कुटुंबांवर चार ते पाच हजार रुपये वीजबिलाचा भुर्दंड पडत असून त्यांची उपजीविकाच धोक्यात आली आहे, असेही संभाजी ब्रिगेडने स्पष्ट केले.
त्यामुळे नवीन बसवलेले स्मार्ट मीटर काढून पुन्हा जुने मीटर बसवावेत, स्मार्ट मीटरद्वारे आलेली वाढीव बिले तात्काळ कमी करावीत, तसेच मीटर बदलण्यासाठी होणारी जबरदस्ती थांबवावी, अशी मागणी करण्यात आली. अन्यथा राज्यभरात तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला.
या आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले, महानगर प्रमुख श्री. जगदाळे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख मीनल दास, वकील आघाडी जिल्हाप्रमुख गणेश कदम, महिला आघाडी शहराध्यक्षा मनीषा कोळी, सुनीता घंटे (जिल्हा उपाध्यक्षा), राजेंद्र माने (जिल्हा सचिव), शेखर भोसले (जिल्हा कार्याध्यक्ष), सिद्धाराम सावळे (शहर व जिल्हा सचिव), सतीश वावरे (शहर कार्याध्यक्ष), जरयाब आबादिराजे, साहिल बागवान, अस्लम शेख, मुरतुज शेख, इस्माईल शेख, गऊस शेख, शफिक मकाशे तसेच अन्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






